पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आठवड्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनाला सक्त सूचना करीत ताकीद दिली आहे. आता नव्याने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना आताच कशी जाग आली? “मावळ’चे खासदार असूनही त्यांना पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी का लावता आला नाही. त्यासंदर्भात कोणतीही कारवाई करता का आली नाही, याचे उत्तर खासदारांनी पहिल्यांदा द्यावे, केवळ टीका करण्याचा प्रकार बंद करावा, अशा शब्दांत पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका केली.
सत्तास्थापनेसाठी राज्यात शिवसेना-कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी समीकरणे जुळत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणेही बदलण्याची चिन्हे निर्माण झाली दिसतात. त्यातच शहरातील पाणीप्रश्नावर भाजप-सेनेमध्ये वाक्युद्ध रंगल्याचे पाहवयास मिळत आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीप्रश्नांवरून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिका प्रशानवावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्यास एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर देत खासदारांवर टिकेचे बाण सोडले. पवार पुढे म्हणाले की, पाणी प्रश्नांवर सत्ताधारी भाजप गंभीर असून, तो सोडविण्यासाठी अचूक पाऊल टाकली जात आहेत. पाणीपुरवठ्या संदर्भातील गेल्या 2 वर्षांतील सर्व कामांच्या चौकशीची मागणी खासदार बारणे हे करणार आहेत. कोणत्याही चौकशीला भाजप घाबरत नसून, त्यांनी दोनऐवजी गेल्या 15 वर्षांतील कामांची चौकशी लावावी, असे पवार यांनी प्रतिसवाल केला. पाणी प्रश्नांवर सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा झाली आहे. त्यात सुचविल्या गेलेल्या उपाययोजनावर प्रशासन काम करीत आहे. पवना जलवाहिनीचा प्रकल्पाचे भिंजत पडलेला प्रश्न खासदार असूनही त्यांना सोडविता आला नाही, असा टोला त्यांनी लगावला. तो प्रश्नही भाजप मार्गी लावणार आहे, असा दावा त्यांनी केला.