नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने राम नावाचा वापर केवळ मतांसाठी केला आहे, प्रभू राम हे सर्वांचेच दैवत आहेत, पण त्यांचा मतांसाठी वापर करणे सर्वथा अयोग्य आहे असे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. मतांच्या राजकारणासाठी रामाला विकण्याचेच पाप भाजपने केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टी (जेकेएनएनपी) स्थापना दिनानिमित्त उधमपूर जिल्ह्यातील गरनई येथे आयोजित सभेला ते संबोधित करत होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, ते म्हणाले की लवकरच निवडणूका होत आहेत. येथे प्रचंड पैसा उडविला जाईल. आमच्या माता आणि मुलींना मंदिराबद्दल वारंवार सांगितले जाईल. मतदानाची संधी साधून राम मंदिराचेही उद्घाटन केले जाईल. जेणेकरून लोक वाढती महागाई आणि बेरोजगारी विसरून जातील असे ते म्हणाले.
मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू राम हे फक्त हिंदूंचे देव नाहीत, हे मनातून काढून टाकले पाहिजे. प्रभू राम हे मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर सर्वांचे देव आहेत. त्याचप्रमाणे अल्लाह देखील सर्वांचा देव आहे, फक्त मुस्लिमांचा नाही. नुकतेच निधन झालेल्या पाकिस्तानातील एका प्रथितयश लेखकाने लिहिले आहे की, रामालाही अल्लाहने लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे आम्हीच रामाचे भक्त आहोत असे म्हणणारे मूर्ख आहेत. त्यांना फक्त राम विकायचा आहे, त्यांना रामाबद्दल प्रेम नाही, त्यांना फक्त सत्तेबद्दल आपुलकी आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.
मत देताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. तुमच्या मताची ताकद नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजांना हाकलण्यासाठी सर्व स्वातंत्र्यसैनिक कसे एकत्र आले ते लक्षात ठेवा. त्यांनी जात, धर्म असा भेदभाव केला नाही, त्यांना फक्त इंग्रजांना हाकलून द्यायचे होते. त्या स्वातंत्र्यसैनिकांना नेहमी मनात ठेवा. तुम्हाला मतदान करण्याची आणि सत्ता बदलण्याची ताकद कोणी दिली हेही ध्यानात ठेवा असेही ते म्हणाले. ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असा आरोप करत फारुख अब्दुल्ला यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास तयार राहण्यास सांगितले.