कोलकाता – राज्यसभेचा मी राजीनामा दिला. मला आता अन्य कोणत्या (लोकसभा) सभेत जायचे नाही. माझ्यासाठी आता फक्त बंगाल सभा (प. बंगाल राज्य) आहे असे प्रतिपादन बॉलिवुडचे सुपरस्टार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केले. येथील भाजपच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 77 जागा जिंकल्या. सगळी शक्ती पणाला लावूनही भाजपचा विचय होऊ शकला नाही. पुन्हा ममता यांचे सरकार आले. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आमदारांची गळतीही सुरू झाली. काही बडे नेते पुन्हा ममतांच्या पक्षात म्हणजे स्वगृही परतले. त्यामुळे राज्य भाजपमध्ये एक मरगळ आली होती.
ती कालच्या मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीमुळे झटकली गेली असून भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी आणि सेल्फी काढण्यासाठी हातात मोबाइल घेतलेल्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.
दरम्यान, आपण गेल्या काही काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाजूला होतो. मात्र आता बरे असून आपण जोरात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सगळे दिल्लीहून कंट्रोल होते. ते सांगतिल ती जबाबदारी आपण स्विकारू असेही त्यांनी नमूद केले.
राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आला नसला तरी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. त्याही श्रेय काही प्रमाणात मिथुन चक्रवर्ती यांना दिले जाते. त्यांनी प. बंगालच्या सर्व जिल्ह्यांत प्रचार केला होता. 55 दिवस ते प्रचारात व्यस्त होते. आता त्यांना पुन्हा मैदानात उतरवून भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे मानले जाते आहे. आपण आता 60 दिवस प्रचार करणार असल्याचे स्वत: मिथुन यांनी सांगितले. त्यामुळे बंगालची निवडणूक भाजप त्यांच्या चेहऱ्यावरच लढणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.