कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीची भाजपने खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल. त्यामुळे पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे भाजपने म्हटले.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांच्या गोटातील पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगून असणाऱ्यांचे राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. पंतप्रधानपद रिक्त नसल्याने सार्वजनिक पैशांवर सुरू असलेल्या राजकीय पर्यटनाचा कुठला फायदा मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.
तर, याआधी 2014 आणि 2019 या वर्षांत आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे आताही त्यासाठी होणारे प्रयत्न निष्फळ ठरतील. भाजपने केंद्रात स्थिर सरकार दिले आहे. ते टाळून देशातील जनता अस्थिर आणि संधिसाधू आघाडीला कौल देणार नाही, असे त्या पक्षाचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी म्हटले.