मुंबई – रोज सकाळी उठायचं आणि केंद्र सरकारवर बोंबा मारत सुटायचं हे राहुल गांधी यांचे धोरण अशोक चव्हाण आणि मविआच्या नेत्यांनी अंगिकारले आहे. त्यामुळेच त्यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली आहे. स्वतः काहीही करायचे नाही आणि केंद्राने केल्यावर त्यांना नावं ठेवायची हे चालणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसींसाठी जाहीर केलेल्या सवलतीही लागू करा, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी केली आहे.