मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावल्याने राजकीय घमासान सुरू झाल्याचे दिसत आहे.
एकीकडे ईडीच्या नोटीसीवरून संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तो बॅनर उतरवला आहे. या सर्व घडामोडी पाहता ईडी नोटीशीवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचे दिसत आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘गेल्या दीड महिन्यांपासून ईडीकडून आमच्याशी पत्रव्यवहार केला जात आहे. त्यांना हवी असलेली सर्व कागदपत्र वेळोवेळी पुरवली जात आहेत. आतापर्यंत कोणत्याही पत्रात भाजपचे नेते नाव घेतल असलेल्या पीएमसी घोटाळा, HDIL प्रकरणाचा उल्लेख यात नाही. भाजप नेते माकडाप्रमाणे उड्या मारताहेत. ईडी आणि भाजप नेत्यांची हातमिळवणी झाली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजप मध्यस्थ गेल्या महिन्यापासून भेटताहेत –
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे काही मध्यस्थ गेल्या महिन्यापासून मला भेटत आहेत. महाराष्ट्रातील सरकार टीकू देऊ नका. आमची यंत्रणा त्यासाठी काम करत आहेत. सीबीआय, इडी आणि आयकर विभागाला हाताशी धरून हे सरकार महिन्याच्या आत पाडणार आहोत. पण मी त्यांचा बाप असल्याने त्यांच्या धमकावण्याला मी भीक घलती नाही.
आम्ही सरकरमधील 22 आमदारांची यादी बनवली आहे. त्यांना इडीकडे बोलावून त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेणार आहोत. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन आहे, असे या हस्तकांनी मला सांगितले. पण हे सरकार पडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावे, असेही राऊत यांनी ठणकावले.