जयपूर : महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. तसेच राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजप कारस्थान रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एवढंच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केला आहे. देशात पाच सरकारं पाडली असून राजलस्थान सरकारही पाडणार, असे भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना सांगण्यात आल्याचेही अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दावा केला आहे की, भाजपने सांगितलं होतं की, हे पाडण्यात येणारं सहावं सरकार असेल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी बोलताना दावा केला आहे की, त्यांच्या राज्यासोबतच महाराष्ट्रातील सरकारही पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. गहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांना आरोप केला आहे की, काँग्रेसच्या काही आमदारांसोबत अमित शाह यांनी एक बैठक घेतली होती. राजस्थानमधील विरोधी पक्ष आणि भाजप नेते गुलाब चंद्र कटारिया यांनी या आरोपांवर पलटवार केला आहे. कटारिया यांनी सांगितलं की, ‘काँग्रेसने जर त्यांच्या पक्षात शांतता राखली तर ते उत्तम पद्धतीने सरकार चालवू शकतील.’
सिरोही जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटना दरम्यान गहलोत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. गहलोत यांच्या सरकारवर जुलैमध्ये अस्थिरतेचं सावट होतं, ज्यावेळी सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वात काही आमदारांनी बंडखोरी केली होती. गहलोत म्हणाले की, बैठकीमध्ये सहभागी आमदारांनी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. राजस्थानमध्ये बोलताना गहलोत म्हणाले की, “त्यांनी राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला होता. सचिन पायलट यांनी 19 आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड पुकारला होता.