मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचा निकाल गुरूवारी 24 तारखेला लागणार असला तरी एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजाच्या आधारावर भाजपाने विजयी जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रदेश भाजपच्यावतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंडप आणि व्यासपीठ उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेशी युती करूनही राज्यातील जनता भाजपला मोठे जनमत देणार असल्याचे अंदाज सोमवारी मतदान झाल्यानंतर व्यक्त करण्यात आले आहेत. अनेक वाहिन्यांनी भाजपला 122 ते 130 जागा मिळणार असल्याचा तर काही वाहिन्यांनी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. याचाच आधार घेत भाजपाने मतमोजणीच्या दिवशी गुरूवारी राज्यभरात जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर विजयाचा जल्लोष करण्यात येणार आहे.
भाजपा प्रदेश कार्यालयाच्यावतीने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांना एका पत्राद्वारे परवानगी मागण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर नरीमन पॉंईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेरील फुटपाथ व त्या परिसरात मंडप व व्यासपीठ उभारण्यात अनुमती द्यावी, अशी या पत्रात मागणी करण्यात आली आहे.
प्रदेश कार्यालयाच्या बाहेर व्यासपीठ उभारून सजावट करण्याचा पक्षाचा मनोदय असून, त्या ठिकाणी विजयी उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे भाजपाच्या पत्रात म्हटले आहे