लखनौ -पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे उत्तर प्रदेशातही भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये आमने सामने लढत होईल आणि निवडणुकीत अखिलेश यादव विजयी होतील, असे तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी “खेला होबे’ असे म्हणून भाजपला चिमटा काढला. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी “खेला होगा’ (खेळ होणार) असे प्रचार गीत केले होते. त्याचा संदर्भ त्यांनी दिला.
गेल्यावर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने भाजपचा मोठा पराभव केला होता. त्यानुसार भाजपचा पराभव होऊ शकतो, याचा संदर्भही त्यांनी दिला.
जर योगी आदित्यनाथ विजयी झाले तर ते लोकांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या संपवून टाकतील, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. यावेळी उत्तर प्रदेशात मतविभाजन होणार नाही. जातीच्या समीकरणाला न घाबरता भाजपला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.