मुंबई – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतलीय. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र त्यांनी काँग्रेसलाच थेट शिंगावर घेतलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये निकराची झुंज देत ममता यांनी भाजपला धूळ चारली. त्यामुळे ममता यांचा प्रमुख शत्रू भाजप असं मानलं जात होतं. मात्र मागील काही दिवसांपासून त्या काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. त्यांनी आजही काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे आगामी काळात ममता विरुद्ध काँग्रेस अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेशवारीवरुन नाव न घेता निशाणा साधला आहे. तुम्ही अर्ध्याहून अधिक काळ जर परदेशात राहिलात तर राजकारण कसे काय कराल? ‘ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवू शकते तर मी गोव्यात काँग्रेसच्या विरोधात का निवडणूक लढू शकत नाही ? असंही ममता यांनी ठणकावून सांगितलं.