पुणे – महाविकास आघडीचे सरकार दोन महिनेही टिकणार नाही, असे आम्ही जेव्हा शपथ घेतली तेव्हा भाजपचे नेते म्हणत होते. आता आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले असून, आताही भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार उर्वरित चार वर्षांचा काळ पूर्ण करणार नाही, असे सांगत आहेत. सरकार पडेल, असे स्वप्न पुढील चार वर्षे पाहात राहावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.
राष्ट्रवादीचे पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड व कॉंग्रेसचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्यादिवसापासून आमचे सरकार टिकाणार नाही, असे भाकीत करत आहेत. आमच्या सरकारला पूर्ण स्थिरता आहे, हे त्यांनाही माहित आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक महाविकास आघाडी लढवत असून, आज दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. आमचे सरकार पडेल हे स्वप्न विरोधकांनी पहात रहावे.