भोपाळ, दि.26 -केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे शेतकरीविरोधी आहेत. ते सिद्ध करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी प्रत्येक कलमाच्या आधारे त्या कायद्यांवर जाहीर चर्चा करण्यास भाजप नेत्यांनी पुढे यावे, असे आव्हान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी दिले.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणारे दिग्विजय त्या राज्यात विविध ठिकाणी बिगर राजकीय स्वरूपाच्या शेतकरी महापंचायतींचे आयोजन करणार आहेत. त्याची घोषणा करण्यासाठी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. मात्र, मोदी सरकारच्या अहंकारामुळे पेचावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांच्या हिताबाबत ते सरकार गंभीर असेल; तर कृषी कायदे दीड वर्षासाठी स्थगित ठेवण्यासाठी अध्यादेश आणावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागणीला कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये याआधीच केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील ठराव मंजूर करण्यात आले.