लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने भाजप आणि संघाच्या नेत्यांनी नाराजीपोटी निष्क्रीयता स्वीकारली आहे. त्या स्थितीचा भाजप नेतृत्वाने धसका घेतला आहे. योगी सरकारचे दिवस भरले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केला.
भाजप आणि संघाचे नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाला बैठकांवर बैठका घ्याव्या लागत आहेत. मात्र, एका नेत्याची मनधरणी केली तर दुसरा नाराज होतो, अशा पेचाला भाजप नेतृत्वाला सामोरे जावे लागत आहे, असे अखिलेश यांनी एका निवेदनात म्हटले.
करोना संकटाच्या हाताळणीबरोबरच विविध आघाड्यांवर योगी सरकारला सपशेल अपयश आले आहे. करोना संकटापेक्षाही सरकारच्या गैरकारभाराला उत्तर प्रदेशातील जनता अधिक वैतागली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निरोप देण्याचे मन जनतेने बनवले आहे.
त्या स्थितीचा अंदाज आल्यानेच उत्तर प्रदेश सरकार आणि पक्ष संघटनेत फेरबदल करण्याच्या चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहेत, असा दावाही अखिलेश यांनी केला.