मुंबई : माथाडी कामगाराणच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी युतीबाबत मुख्यमंछ्यांनी अपेक्षेप्रमाणे मौन पाळले तर ठाकरे यांनी मात्र महायुतीचेच राज्य येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपाला युती करायची नाही याबाबतचे गुढ कायम राहिले आहे. दरम्यान, युतीत जागावाटप झाल्याचे मेसेज काल रात्री फिरू लागले. त्यात शिवसेनेची केवळ 105 जागांवर बोळवण केल्याचे म्हटले जात होते. तर भाजपा 165 आणि मित्र पक्षांना 18 जागा सोडण्यात आल्याचा तोडगा निघाल्याची चर्चा होती. मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही.
अण्णासाहेब पाटील यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला 50 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त नवी मुंबई येथे आयोजित मेळव्याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला 50 वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांनी मुंबईत मराठी माणसांमध्ये संघर्षाची ताकद पेटवली. बाळासाहेब आणि अण्णासाहेब एकत्र आले, पण ते जर गेले नसते तर या महाराष्ट्र राज्याने पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झालेला पाहिला असता. नुसती ओझी वाहू नका, तुमच्या हक्काचे सरकार आले पाहिजे. लोकसभेआधीच निर्णय घेतला असता तर नरेंद्र पाटील आज खासदार असते. आता याचा अर्थ साताऱ्याच्या जागेवर कलगीतुरा रंगणार असा लावू नका. तुम्ही वाघनखे आहात, तुमच्या ताकदीवर ही चळवळ सुरू आहे. महाराष्ट्राची माती देशाला दिशा देते. राज्यातील निवडणूक आम्ही जिंकणार आहोतच, राज्यात महायुतीचेच सरकार येणारच आहे, असा देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.