बाळासाहेब थोरात ः राज्यभरात “भाजप हटाओ, आरक्षण बचाओ’ आंदोलन करणार
मुंबई : आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण कॉंग्रेस पक्ष भाजपचा हा कुटील डाव हाणून पाडेल आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकारविरोधात तीव्र लढा उभारेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारविरोधात “भाजप हटाओ, आरक्षण बचाव’ आंदोलन केले.
यावेळी थोरात म्हणाले, उत्तराखंडमधील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी मिळून एससी, एसटी, ओबीसींना संविधानाने दिलेला आरक्षणाचा मुलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एससी, एसटींना नोकरीत आरक्षण देणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी नाही, असे उत्तराखंड भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते. दुर्दैवाने सुप्रिम कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून सरकारी नोकरीत आरक्षण द्यायचे की नाही, हे सरकारवर अवलंबून आहे, असे म्हटले.
हा प्रकार आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वारंवार आरक्षणावर पुनर्विचार करण्याची आणि आरक्षण संपवण्याची मागणी केली आहे. त्याच दृष्टीने केंद्र आणि विविध राज्यातील भाजप सरकारे काम करत आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कॉंग्रेस सरकारने एससी, एसटी सबप्लानच्या माध्यमातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता.
मात्र मोदींनी सत्तेवर आल्याबरोबर एससी, एसटी सबप्लान संपवून दलित, आदिवासी, मागासवर्गीयांसाठींच्या योजनांचा निधी कमी केला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. दलित मागासवर्गीयांना नोकऱ्या मिळू नयेत, नोकऱ्यांमधील त्यांचा बॅकलॉग भरू नये, दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांना निधी मिळू नये, हीच केंद्र सरकारची कार्यपद्धती राहिलेली असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या बजेटमध्येही कपात केली आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
भाजपशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार
भाजपशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी, मागासवर्गीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार देशभरात दररोज जवळपास 120 दलित अत्याचाराच्या घटना घडतात. भाजपशासित राज्यात दलित मागासवर्गीयांना न्याय मिळत नसून त्यांच्यावर फक्त अत्याचार केले जातात. हा अत्याचार रोखण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्काची लढण्यासाठी कटिबद्ध असून पुढच्या आठवडाभरात संपूर्ण राज्यात जिल्हा आणि तालुकास्तरावर “भाजप हटाओ, आरक्षण बचाओ’ आंदोलन करणार असल्याची घोषणा थोरात यांनी केली.