नवी दिल्ली – केंद्र सरकारने चर्चेसाठी शेतकऱ्यांना दारे नेहमीच उघडी ठेवली आहेत. मात्र, विरोधकांनी शेतकरी आंदोलनाला आणखी एक शाहीनबाग बनवू नये, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले.
केंद्रीय कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने संसदेचे कामकाज विस्कळीत होत आहे.
त्यावरून बुधवारी भाजपचे नेते भुवनेश्वर कालिता यांनी राज्यसभेत विरोधकांना फटकारताना शाहीनबाग आंदोलनाची आठवण करून दिली.
दिल्लीतील शाहीनबाग परिसरात काही महिन्यांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात (का) दीर्घकाळ आंदोलन चालले. त्याचा संदर्भ देऊन कालिता म्हणाले, तो कायदा संसदेने मंजूर केला. मात्र, त्याविरोधातील आंदोलनाला कॉंग्रेसने पाठिंबा दिला.
त्यानंतरही कॉंग्रेसची निवडणुकांत पीछेहाट झाली. कृषी कायद्यांनाही व्यापक चर्चेनंतर संसदेची मंजुरी मिळाली. आता त्यावर आक्षेप घेऊन विरोधक आणखी शाहीनबाग बनवू पाहत आहेत. सरकारला शेतकऱ्यांविषयी पूर्ण आदर आहे. त्यामुळेच कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.