मुंबई – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापन करण्यास अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याची भूमिका घेतल्याने भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा केला. मात्र त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तास्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे.
सुरुवातीपासूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विधानांना सुधीर मुनगंटीवार प्रत्युत्तर देत आहेत. अशातच नारायण राणेंनी मंगळवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, नारायण राणेंनी दिलेली ही प्रतिक्रिया त्यांची व्यक्तिगत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. काही पक्षांनी पाठिंबा मिळाल्याचा आव आणला तरीही असमर्थ ठरले, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर झाला असून योग्य क्षणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असंही ते म्हणाले. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वभिमानी पक्षाचे १५ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये विलीनीकरण झाले आहे. यावेळी खासदार निलेश राणेंसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेनेवर प्रहार केला होता.