सातारा – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ प्रबोधन मंचने रॅली काढून अप्पर जिल्हाधिकारी आर. एस. शिंदे यांना सोमवारी निवेदन दिले. शाहू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. दरम्यान कराड शहरामध्येही “का’ कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने रॅली काढून आपले समर्थन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की नागरिकत्व सुधारणा कायदा करण्यात आलेला असून त्यामध्ये भारतातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर धर्मांचे नागरिक आहेत. त्यांचा आणि या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा काहीही संबंध नाही. हा कायदा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून तिकडे होणाऱ्या धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात पळून आलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन धर्मियांसाठी आहे.
बाकीच्या देशातून भारतात आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व 11 वर्षात मिळते परंतु या लोकांना ते 5 वर्षात मिळणार आहे. यामध्ये सध्याच्या नागरिक असलेल्या कोणत्याही धर्मियांना याचा त्रास होणार नाही, असे स्पष्ट असले तरी काही राष्ट्रद्रोही प्रवृत्ती लोकांमध्ये गैरसमज पसरवून राष्ट्राचे नुकसान करीत आहेत. या कायद्यावरून संपूर्ण देशात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दंगे सुरू आहेत. वास्तविक पाहता हे सर्व दंगे मुद्दाम घडवून आणले जात आहेत.
आम्ही या दंग्याचा पूर्णपणे विरोध करतो आणि दंगलखोरांवर शासनाने कडक कारवाई करावी, त्यांच्यावर कठोर शासन करावे अशी विनंती करतो. आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करतो आणि संपूर्ण देशात हा कायदा लागू करावा अशी मागणी करतो असे निवेदनात म्हटले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, शहर सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुहास दर्भ, मुकुंद आफळे, नगरसेवक प्राची शहाणे, राहुल शिवनामे, प्रवीण शिवनामे उपस्थित होते. प्रारंभी नगरपालिका येथून रॅलीस प्रारंभ झाला. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली जिल्हा पोलीस मुख्यालयामार्गे पोवई नाका येथे आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन दिल्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या सीएए म्हणजेच सिटीझन अमेंडमेंट ऍक्टच्या समर्थनार्थ सोमवारी कराडमध्ये भाजपने रॅली काढून या कायद्याला आपले समर्थन व्यक्त केले. यावेळी सीएए के सन्मान मे, आये हम मैदान मे, पुलिस के सन्मान मे, आये हम मैदान मे यासह भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, विद्यानगर परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी समर्थनार्थ रॅली काढली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीस प्रारंभ झाला.
त्यानंतर ही रॅली कन्या शाळा मार्गे मुख्य रस्त्यातून चावडी चौक, नेहरु चौक, आझाद चौक मार्गे दत्त चौकात आली. येथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत झाले. आणि ही रॅली विसर्जित करण्यात आली. यावेळी रॅलीत सहभागी नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अनेक तरुणांनी वुई सपोर्ट सीएए असे लिहलेले बॅनर्स हातात घेतले होते. सीएए हा भारतीय संसदेने केलेले कायदा असून तो प्रत्येक राज्यासाठी बंधनकारकच आहे.
या कायद्याचा आणि आधीपासून भारतीय नागरिक असणाऱ्या कोणत्याही धर्मियांचा काहीही संबंध नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या देशांमधील मूळ नागरिक असणाऱ्या परंतु तेथील बहुसंख्यांकांच्या भितीमुळे भारतात राहत असणाऱ्या अल्पसंख्याकांना कायदेशीर नागरिकत्व देण्याबाबत हा कायदा बनवण्यात आला आहे. त्याबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असून लोकांमध्ये राजकीय हेतूने भयाचे वातावरण पसरवले जात आहे. सीएए मुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नसून उलट माणुसकीच्या दृष्टीकोनातून नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला असल्याने या कायद्यास आमचे समर्थन आहे. असे प्रतिपादन भाजपच्या नेत्यांनी केले.