नागपूर – मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजप पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी परमबीर सिंग आणि भाजप यांचं साटलोटं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालं आहे. गृहमंत्री देशमुख नागपूरचे असून राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ताकद उभी केली आहे. यावेळी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून टरबूज अर्थात कलिंगड फोडून भाजप आणि परमबीर सिंग यांचा निषेध केला आहे. यावेळी भाजपविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप केला होता. त्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपकडून देखील राज्यभरात गृहमंत्री देशमुख यांचा निषेध करण्यात येत आहे. बारामतीत देशमुख यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलं आहे.