कायद्याच्या चौकटीतून कॉंग्रेस करणार विरोध
पुणे – नागरिकत्वाचा कायदा हा कॉंग्रेसच्या काळात अंमलात आला असल्याचा भाजपाकडून करण्यात येणारा प्रचार खोटा असून हा कॉंग्रेसला बदनाम करण्याचा डाव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. घटनेतील 14व्या कलमातील समानतेला फाटा देणारा हा कायदा असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एनआरसी आणि सीएएला देशभरातून विरोध होत आहे. हे सरकार पद्धतशीरपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवित आहे. सीएएची अंमलबजावणी राज्यात करणार नाही, असा ठराव केला असून याबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे ही त्यांनी सांगितले.
राज्य घटनेचे मुळ सार आहे त्यात धर्मनिरपेक्षतता हा मुद्दा महत्वाचा आहे. पण, त्याला छेद देऊन धर्माच्या नावावर नागरिकत्व देण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे भाजपाने घटनेतील मुळ 14व्या कलमावर घाला घातला आहे. आगामी काळात धर्माच्या नावावर कायदे करणे सोपे जावे यासाठीच हा प्रयत्न सुरु आहे. हे चुकीचे आहे. कॉंग्रेसचा याला तीव्र विरोध असणार आहे. हा विरोध सामजिक स्तरावर नाही तर कायद्याच्या चौकटीतून विरोध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.