नवी दिल्ली – गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या मुद्दयावरून केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भारतीय लष्कराबाबत फारच मर्यादित ज्ञान असल्यामुळे कॉंग्रेस पक्ष भारतीय लष्कराचे मनोधैर्य खच्चीकरण करत आहेत, असे ते म्हणाले.
गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकांना निःशस्त्र का पाठवले गेले, असा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांकडून विचारला जातो आहे. यातूनच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे, हे सिद्ध होते. त्यांना आंतरराष्ट्रीय करारांबद्दल काहीच माहिती नाही का ?असे नड्डा म्हणाले. राजस्थान राम संवाद रॅलीमध्ये ते बोलत होते.
विरोधकांकडून जी भाषा वापरली जात आहे, त्यातून कुटुंबाची मूल्येच दिसत आहेत. ही मूल्ये देशाशी संबंधित नाहीत. कॉंग्रेस नेत्यांना पंतप्रधानांबद्दल आदर तर नाहीच. उलट पंतप्रधानांनी काढलेले अध्यादेशही तुम्ही फाडून टाकता, अशा शब्दात नड्डा यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. जेंव्हा सर्व देश पंतप्रधानांना पाठिंबा द्यायला तयार आहे, तेंव्हा कॉंग्रेस पक्ष काय झाले आणि कसे झाले, असे प्रश्न विचारत आहे, अशा शब्दात पूर्व लडाखमधील संघर्षाच्या मुद्दयावर पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा संदर्भ देऊन नड्डा म्हणाले.
राजस्थानमध्ये अलीकडच्या काळात विकास थांबला आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्राची स्थिती वाईट असल्याचे सांगून नड्डा यांनी राजस्थान सरकारवरही टीका केली.