नवी दिल्ली : देशात या वर्षांच्या सुरुवातीला पार पडलेल्या आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले सर्व प्रयत्न पणाला लावले असल्याचे दिसले. त्यातच भाजपाकडून या राज्यातील निवडणुकांसाठी पाण्याप्रमाणे पैसा ओतला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने त्यांच्या खर्चाच्या जवळपास 60 टक्के रक्कम तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरली आहे. याविषयीची माहिती भाजपाने निवडणूक पॅनेलकडे सादर केलेल्या विवरण पत्रात दिली आहे.
पॅनेलसमोर सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणानुसार, भाजपाने निवडणूक प्रचारासाठी तब्बल २५२ कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्च केलेल्या २५२ कोटी २ लाख ७१ हजार ७५३ रुपयांपैकी ४३.८१ कोटी आसाम निवडणुकीसाठी आणि ४ कोटी ७९ लाख रुपये पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी होते.
तामिळनाडूमध्ये, जिथे द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी AIADMK कडून सत्ता हिसकावून घेतली, तिथे फक्त २.६ टक्के मते मिळवणाऱ्या भाजपाने प्रचारात २२ कोटी ९७ लाख रुपये खर्च केले. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार केला. त्यांनी राज्यात १५१ कोटी खर्च केले.
केरळमध्ये, जेथे विद्यमान एलडीएफने सत्ता कायम ठेवली, तेथे भाजपने २९ कोटी २४ लाख खर्च केले. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत.त्यानुसार आता सर्व पक्षांनी निवडणुकीत किती खर्च केला याविषयीची माहिती समोर येत आहे.