मुंबई – बृहन हैदराबाद महानगपरपालिकेत तीन जागांवरुन 48 जागांपर्यंत झेप घेण्याची किमया करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता मुंबई महापालिकेत या यशाची पुनरावृत्ती करायचे ठरवले असून, स्पष्ट बहुमतासह मुंबई मनपामध्ये कमळ फुलवण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षांची मुंबईमधली शिवसेनेची मक्तेदारी मोडून, आता ज्या ज्या महापालिकांत शिवसेनेची सत्ता आहे, त्या प्रत्येक ठिकाणी “मिशन हैदराबाद’ यशस्वी करुन दाखवण्याचा चंग पक्ष नेतृत्त्वाने बांधला आहे.
हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या एम आय एम पक्षाला 44, भाजपाला 48 तर टीआरएस अर्थात तेलंगण राष्ट्र समितीला 55 जागा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळाल्या. या महापालिकेत वर्ष 2016 मध्ये भाजपाला अवघ्या तीन जागा होत्या. मात्र, भाजपाने आपली सर्व शक्ती पणाला लावत, राष्ट्रीय नेत्यांना प्रचारात उतरवत चमत्कार घडवून आणला. आता पक्षाचे पुढचे लक्ष्य मुंबई महापालिका असल्याचे समजते. भाजपच्या या हनुमान उडीमुळं आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका हे पुढचं लक्ष्य ठेवलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं आवश्यक आहे हे भाजप जाणून आहे. त्यामुळं मुंबईतही विशिष्ट रणनीती घेऊन उतरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. हैदराबादमध्ये चाललेला हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईत चालेल का, याबद्दल शंका आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप फारतर शिवसेनेवर टीका करू शकेल. मात्र, हा मुद्दा प्रमुख ठरण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.
मात्र असं असलं तरी, शिवसेनेसारखा प्रखर हिंदुत्त्वाची कास धरलेला पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याने, शिवसेनेचा परंपरागत मतदार, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सर्वसामान्य नागरिक शिवेसेनेपासून दूर गेला आहे. सरकारची बहुतांश धोरणे आणि निर्णयही शिवेसेनेच्या तत्त्वांच्या विरोधात गेल्याचे सर्वांनी पाहिले आहे. अशातच कॉंग्रेसमधून आयात केलेल्या उर्मिला मातोंडसारख्या वादग्रस्त सिनेस्टारला शिवसेनेने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानेही शिवसेना नेते नाराज आहे. कॉंग्रेस संस्कृतीप्रमाणेच आता सेनेतही निष्ठावंतांना डावलले जात असल्याचे भावना निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यातील सत्तासमीकरण बदललं आहे. मुंबईची निवडणूक आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार, अशी चर्चा आहे. तसं झाल्यास भाजपसाठी ते मोठं आव्हान असेल. मात्र, हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यास मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होईल. अशा परिस्थितीत संघटनात्मक बांधणी उत्तम असलेल्या पक्षांना अधिक फायदा होईल. आघाडीतील पक्ष एकत्रितपणे न लढल्यास शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होईल. या लढतीत कुंपणावरील मतदार खेचण्यात कोण यशस्वी होतो, हे निर्णायक ठरेल. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचीच खरी कसोटी लागणार असल्याचे सध्या तरी मानले जात आहे.
मुंबई मनपाच्या पुढील निवडणुका वर्ष 2022 मध्ये असल्या तरी भाजपाने आतापासूनच पक्षबांधणी आणि शिवसेनाविरोधात रान उठवण्याचे ठरवले असल्याचे पक्षाच्या मुंबई शाखेच्या सूत्रांनी सांगितले आहे.