कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये तिकीट वाटपावरून भाजप मध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून अनेक मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निवडणूक कार्यालयात जाऊन तेथे निदर्शने केली. तेथे दगडफेकीचाही प्रकार झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान पक्षातील या असंतोषाला तृणमुल कॉंग्रेसकडून फूस दिली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना या छोट्या विषयांवरील वाद थांबवण्याचे आवाहन केले असून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
मगराहट, कॅनिंग वेस्ट, कुलताली, जॉयनगर येथे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी ज्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही ठिकाणी पोलिस व भाजप कार्यकर्त्यांमध्येही धुमश्चक्री झालेली पहायला मिळाली. आजवर आम्ही ज्यांच्या विरोधात प्रचार केला आज तेच भाजपचे उमेदवार म्हणून आमच्या पुढे आले आहेत ते आम्हाला मान्य नाही अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली. वेस्ट कॅनिंग मतदार संघात केवळ पाच दिवसांपुर्वी भाजप मध्ये आलेले अर्णव रॉय यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापले होते.
भ्रष्टाचारात गुंतलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली आहे असा आरोपही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. रविवारी भाजपने 63 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षात हा असंतोष अधिक उफाळून आला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सयंतन बसू यांनी सांगितले की या प्रकरणात पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष घालीत आहेत. काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा भाजपचे प्रवक्ते शामिक भट्टाचार्य यांनी निषेध केला आहे. तथापि पोलिसांनी या कृतीचे समर्थन केले असून त्यांनी म्हटले आहे की कार्यकर्त्यांच्या निदर्शनाला नियंत्रणात आणण्यासाठी ही कृती आवश्यकच होती.