नवी दिल्ली – ज्यांचे भाजपबरोबर वैचारिक मतभेद आहेत, त्यांना भाजपने कधीही देशद्रोही मानले नाही. त्यांना केवळ विरोधक मानले, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आज आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा एक पळवाट म्हणून वापरायला सुरुवात केली आहे. भाजपच्या राजकीय विरोधकांवर “देशद्रोही’ पणाचा आणि पाकिस्तानसारख्या शत्रूची भाषा बोलूण्याचा आरोप केला जायला लागला आहे. त्याच पार्श्वभुमीवर आडवाणी यांनी एका ब्लॉगद्वारे पक्षातील नेत्यांना एक संदेश दिला आहे.
“वैविध्यतेचा आणि अभिव्यक्तीचा आदर राखणे हेच भारतीय लोकशाहीचे सार आहे. पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपने कधीही राजकीय विरोधकांना “शत्रू’ मानले नाही, तर केवळ “विरोधक’ असेच मानले आहे. त्याच प्रमाणे आपल्या भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्येही ज्यांच्याबरोबर आपली राजकीय मतभिन्नता आहे, त्यांना “देशद्रोही’मानले जात नाही. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक आणि राजकीय निवडीच्या अधिकार भाजपाने नेहमीच स्वीकारला आहे.’ असेही आडवाणी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.आडवाणी यांनी तब्बल 5 वर्षांनंतर ब्लॉगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहेत.