कोलकाता – भारतीय जनता पार्टीला पराभूत केले जाऊ शकते हे प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सिद्ध झाले असून, राज्यातील जनतेने तो मार्ग दाखवला आहे, अशी टिप्पणी करतानाच भाजपला आता राजकीय ऑक्सिजनची गरज असल्याची जोरदार टीका तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
हीच लोकशाही असते आणि लोकशाहीत लोकांचा निर्णय अंतिम असतो. लोकशाहीत अहंकार नसतो आणि आता जनतेने मार्ग दाखवला आहे, असे एका मुलाखतीत ममता यांनी सांगितले. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. ते लोक अडचणी निर्माण करतात. ते खोटे व्हिडिओ तयार करतात, सत्तेचा दुरुपयोग करतात, केंद्रीय तपास संस्थांचा दुरुपयोग करतात, इतकेच नव्हे तर देशाच्या संघराज्यात्मक चौकटीवर बुलडोझर फिरवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे ममता म्हणाल्या.
भाजप ऑक्सिजन देत नाही, सार्वत्रिक लसीकरणाला परवानगी देत नाही, असा आरोप करताना त्यांनाच आता राजकीय ऑक्सिजनची गरज असल्याची टीका त्यांनी केली व लोकांनी एकत्र येऊन आता भाजपविरोधात लढावे, असे आवाहन त्यांनी केले.