पुणे – भामा-आसखेड योजनेची अंतिम चाचणी सुरू आहे. पण, याचे श्रेय घेण्यावरून वडगावशेरी मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने योजनेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या सभेत बुधवारी मंजूर करून घेतला. तर, हे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा ठराव यापूर्वी मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता उद्घाटनावरून “पाणी पेटण्याची’ चिन्हे आहेत.
महापालिकेने सुमारे 418 कोटी रुपये खर्चून या योजनेचे काम केले आहे. ही योजना तत्कालिन केंद्र सरकारच्या “जेएनएनयूआरएम’ योजना अनुदानातून 2013 मध्ये सुरू करण्यात आली. मात्र, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वेळोवेळी हे काम बंद पडले. त्यानंतर आता हा प्रकल्प चाचणीच्या टप्प्यात असून पुढील दोन आठवड्यांत या प्रकल्पामुळे नगररस्त्याच्या पूर्ण डाव्या बाजूचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
मात्र, ही योजना आपल्या आणि आपल्या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाल्याचा दावा माजी आमदार जगदीश मुळीक आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे करत आहेत. तर महापालिकेने या पूर्वीच या योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा ठराव मंजूर केला असताना; मुळीक यांनी योजनेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर टिंगरे यांनी आधीच उद्घाटनाचा ठराव झाल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावरून वाद सुरू असतानाच आता भाजपने पक्षनेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळेदोन ठराव झाल्याने नेमकी कोणत्या ठरावाची अंमलबजावणी करणार? यावरून वाद होणार आहेत.