मुंबई – मागील काही दिवसांपासून ड्रग्ज आणि इतर मुद्दांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडत आहेत. त्यात एनसीबीची एन्ट्री झाली. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले. आता मलिक यांनी पुन्हा भाजप आणि एनसीबीला लक्ष्य केलं आहे.
भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.
पूर्वी रेव्ह पार्टीतील संशयितांच्या त्यांची रक्त आणि लघवीचे नमुने घेऊन सोडण्यात येत होते. संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र आता एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत. मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
याआधीही मलिक यांनी पुराव्यासह एनसीबीवर आरोपे केले होते. नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीला ठोस प्रत्युत्तरही देता आले नव्हते.