मुंबई – भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मी आवाहन करतो की समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत, मुंबईत काय फर्जीवाडा केलाय तो समोर येईल, असे नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढील आठवड्यात देणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.
पूर्वी जेव्हा-जेव्हा रेव्ह पार्टीज झाल्या आहेत त्यावेळी जे संशयित सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. नमुना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप केले वा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने तपासणीसाठी घेतलेले नाहीत. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर त्यांना आरोपी ठरवले जात आहे. केसेस खोट्या असल्यानेच नमुने घेतले जात नसल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.