नवी दिल्ली – भाजपने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातृश्री मनेका गांधी यांना वगळले. लखीमपूर खेरी येथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल टीका करणारे ट्विट वरुण गांधी यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मात्र या करणामुळे वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना वगळण्यात आल्याचे पक्षाने फेटाळले आहे. पक्षांतर्गत असे फेरबदल केले जातच असतात, असे पक्षातील सूत्रांनी म्हटले आहे.
लखीमपूर प्रकरणावर भाजपमधील केवळ वरुण गांधी यांनी भाष्य केले होते. लखीमपूरमध्ये जमावामध्ये कार घुसवून 8 जणांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री आजित मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा याला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसेच त्यांची अद्याप चौकशीही केली गेली नाही.
वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या जमावामध्ये पाठिमागून कार घुसवण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चार शेतकरी मगण पावले आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीमध्ये आणखी चौघेजण ठार झाले. हा व्हिडीओ पुरेसा बोलका असून ही घटना म्हणजे हत्या असल्याचे वरुण घांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करावा आणि मयत शेतकऱ्यांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारे पत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पाठवले आहे.