नांदेड : महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांचे दाजी म्हणजेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. या पराभवानंतर सूर्यकांता पाटील आणि भास्करराव खतगावकर यांनी वेगळ्या वाटा निवडल्याने भाजपच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्यांवर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
माजी खासदार खतगावकर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. त्यावर त्यांचे मेहुणे अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. यानंतर त्यांना आज विचारले असता “खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकं सांगू शकतो” असे अशोक चव्हाण म्हणाले.
कोण आहेत भास्करराव पाटील खतगावकर?
भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देऊन अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.