– रवींद्र देशमुख
पुणे – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापैकी प्रमुख असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथीदाराची गरज भासणार असं मत अनेकांनी आधीच व्यक्त केलं आहे. त्यानंतर भाजपनेत्यांची देखील मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी रिघ लागली होती. त्यातच राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसे-भाजप युती कधीही होऊ शकते, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणामुळे भाजप-मनसेचं जुळण्याआधीच फिसकटलं की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यातील शिवसेना आणि भाजपची अनेक वर्षांची युती तुटली अन् राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. अशीच परिस्थिती मुंबई महापालिकेत होऊ नये, यासाठी भाजपने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मनसेच्या जवळ जाण्याचे भाजपने प्रयत्नही सुरू केले होते. मात्र राज ठाकरेंना उत्तर प्रदेशातील भाजपच्याच खासदाराकडून होणाऱ्या विरोधामुळे भाजपचे प्रयत्न वरकरणी होते का, असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांच्या मनात येण्यास जागा निर्माण झाला आहे.
मनसेने भोंग्यांच्या मुद्दांवर घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपची संपूर्ण फौज राज ठाकरे यांच्यासाठी मैदानात उतरली होती. याच कालावधीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मांडलेल्या भूमिकेमुळे युती फिसकटल्याचं दिसून येत आहे.
‘ट्रॅप’ लक्षात आल्याने आयोध्या दौरा रद्द – राज
आयोध्या दौरा रद्द करण्यापूर्वीच मी उत्तर प्रदेश, दिल्लीतून माहिती घेतली. त्यानंतर मला लक्षात आलं की हा ‘ट्रॅप’ आहे. त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. अनेकांना माझी आयोध्यावारी खुपली. तरी मी आयोध्या वारी केलीच असती तर आपल्या मुलांवर गुन्हे दाखल झाले असते. त्यानंतर मुलांमागे चौकशांचा ससेमीरा लावला गेला असता. मग ऐन निवडणुकीच्या वेळी मनसैनिक अडकून पडली असती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच एक कुठचा खासदार उठतो अन् उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. अनेक विविध कंगोरे माझ्या दौऱ्याला आहेत. जे मी सांगू शकत नाही, असंही राज यांनी नमूद केलं.
दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातं उल्लेख केल्यानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांवर उत्तर प्रदेशात वादानंतर गुन्हे दाखल झाले असते. हाकनाक या मुलांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला असता. मला ते होऊ द्यायचं नव्हतं, अस म्हटलं. शिवाय एक खासदार मुख्यमंत्र्यांना आव्हान कसाकाय देऊ शकतो, असं म्हणत राज यांनी भाजपच्या संभाव्य मैत्रीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केल आहे. यावेळी त्यांनी गुजरातमध्येही उत्तर भारतीयांना एका रात्रीत हाकलण्यात आलं होतं, म्हणत तिथं कोणाला माफी मागायला लावणार असा प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षरित्य भाजपच्या नेतृत्वाला टोला लागवला आहे.
एकंदरीतच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागण्याच्या मुद्दावरून भाजप-मनसे युती फिसकटते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.