जयपूर – राज्यसभा निवडणुकीच्यावेळी आमदारांचा घोडेबाजार झाला, असा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता, त्या अनुषंगाने भाजप आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. विधिमंडळाच्या सचिवांकडे त्यांनी या प्रस्तावाची प्रत सादर केली. रामलाल शर्मा, अशोक लाहोटी, मदन दिलवारा या आमदारांनी एकत्रितपणे हा हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, असे या आमदारांनी म्हटले आहे. 22 जूनला अपक्ष आमदार शाम लोढा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. 23 अपक्ष आमदारांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारे विधान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात हा हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्यावेळी आमदार फोडण्यासाठी भाजपकडून 35 कोटींची ऑफर दिली गेली होती, असा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर तेथील राजकारणात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात मोठेच आरोप प्रत्यरोप सुरू झाले आहेत.