काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या वीर सावकारांबाबतच्या वक्तव्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. कारण यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहुल गांधी यांच्या या यात्रेला पाठिंबा असल्याने भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मात्र, “राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“…चांगली बाब आहे” – शिवसेनेतील फुटीबाबत बोलताना राहुल गांधींनी मांडला तर्क
वीर सावरकरांबद्दल आमच्या मनामध्ये नेहमीच आदराचे स्थान आहे. त्यामुळे ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नाही, अशा कोणत्याही संस्थांनी आम्हाला सवाल करणे दुर्दैवी आहे. निजामांच्या काळात हिंदूंवर होणारे किती अत्याचार आरएसएसने थांबवले. त्यावेळी कुठे होती ही सारी मंडळी? पीडीपीबरोबर युती करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्वाच शहाणपण शिकवू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरे यांनी सतत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे पाय धरल्याने त्यांना आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी वीर सावरकरांना शिव्या देत आहेत आणि आदित्य ठाकरे त्यांच्या सोबत चालत आहेत. भाजपचे हिंदुत्व संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे.” अशा बोचऱ्या शब्दांत प्रसाद लाड यांनी टीका केली आहे.