लखनौ, दि. 17 – उत्तर प्रदेशातील एका भाजप आमदाराने आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करणारी वक्तव्ये केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राकेश राठोड असे या आमदाराचे नाव असून ते सीतापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या राज्यात आमदाराला काहीच किंमत नाही.
आम्ही जास्त काही बोललो तर आमच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही काही बोलू नका, सरकार काय सांगते आहे ते गुपचूपपणे ऐका असे त्यांनी म्हटले आहे. सीतापूर जिल्ह्यात बऱ्याच वर्षांपूर्वी सरकारी ट्रॉमा सेंटरची इमारत उभारण्यात आली आहे, पण ती अजून सुरू झालेली नाही. ती कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, मी खूप प्रयत्न केले पण आमचे काहीच चालत नाही.
कारण आम्हाला येथे काहीच किंमत नाही. तुम्ही तुमच्याच सरकारकडे हा विषय का काढत नाही असे विचारता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या मनातील इच्छा सरकारकडे मोकळेपणाने बोलता येते असे तुम्हाला वाटते काय? हा विषय मी अनेक वेळा उपस्थित केला पण आमचे कोणी ऐकत नाही. राठोड हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. गेल्यावर्षीै त्यांची मोदींच्या कारभारावर टीका करणारी क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्यावेळी त्यांच्याकडे पक्षाने खुलासा मागवला होता.