मुंबई – बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीसांनी एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडे एमआयएमच्या दोन आमदारांचे सही असलेले लेटरहेड आढळले आहेत. ते पोलीसांनी जप्त केले आहेत. त्या दोन्ही आमदारांना अटक करा अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
शेख असिफ शेख रशीद आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील अशी त्या दोन आमदारांची नावं आहेत.
‘बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी एमआयएम च्या आमदाराचे लेटर हेड वापरले आहेत. देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धाकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी करा. देशद्रोह्यांना अटक करा,’ असं ट्विट भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
एमआयएमचे आमदार शेख असिफ शेख रशीद आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील यांच्या लेटरहेडचा वापर करून देशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचं काम सर्रासपणे सुरू होतं.
अटक करण्यात आलेल्या टोळीकडे एमआयएम आमदारांची 7 कोरी लेटरहेडदेखील सापडली आहेत. हा अत्यंत धोकादायक आणि घातक प्रकार आहे. त्यामुळे त्या दोन्हीही आमदारांना तातडीने अटक करा, असेही भातखळकर म्हणाले आहेत.