नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जर त्यांचा मुलगा आशिष रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या भीषण हिंसाचाराच्या ठिकाणी असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे समोर आले तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे त्यांनी म्हटले आहे.
अजय मिश्रा यांनी यापूर्वी दावा केला आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता त्याठिकाणी त्यांचा मुलगा आशिष नव्हता. तो इतरत्र एका कार्यक्रमाला उपस्थित होता याचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे आहेत. शेतकरी संघटनांचा दावा आहे की, एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला घेऊन जाणारी गाडी आंदोलकांवर घालण्यात आली. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. या प्रकरणी आशिष मिश्राविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जुलैमध्ये केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री बनलेले अजय मिश्रा लखीमपूर खेरीतील हिंसाचारानंतर पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले आहेत. या वादानंतर अजय मिश्रांच्या नावाची देशभरात चर्चा होत असली तरी ते लखीमपूर खेरीमध्ये दीर्घ काळापासून एक मजबूत नेते असल्याचे मानले जाते. लखीमपूर जिल्ह्यात ‘तेनी महाराज’ म्हणून अजय मिश्रा प्रसिद्ध आहेत. अजय मिश्रा, हे सध्या केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.