लखनौ – भाजपच्या जाहीरनाम्याला विलंब झाल्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्या पक्षाची खिल्ली उडवली आहे. भाजपचा जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.
जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा मोठ्या चर्चेचाही विषय बनला आहे. मात्र, भाजपने अजून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर, अखिलेश यांनी ट्विटरवरून भाजपला लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांचा अच्छे दिनवाला जाहीरनामा निवडणुकीनंतर येणार का, अशी विचारणा विकास करत आहे. यावेळी अच्छे दिन आने वाले हैं असे भाजपवालेही एकमेकांना सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. मग, ते जनतेला तसे कसे काय सांगणार, असा सवाल अखिलेश यांनी केला.