वाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची महाजनादेश यात्रा रविवार, दि. 15 रोजी दुपारी साडेबारा वाजता वाईत येत आहे. येथील शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनादेश यात्रा राज्यात सुरू आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा नगरपासून सुरू होऊन ही यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. यात्रा शिरवळ-खंडाळा-वेळे-सुरूर-केंजळ फाटा-शेंदुरजणेमार्गे वाईत येत आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत केले जाणार असून वाईतील शिवाजी चौकात सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश मिळवले. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी काशिनाथ शेलार, अजित वनारसे, विजय ढेकाणे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, यशवंत लेले, नगरसेवक महेंद्र धनवे, सतीश वैराट, रोहिदास पिसाळ उपस्थित होते.