नागपूर: भाजपने पाच वर्षात विदर्भाला कंगाल केले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त आश्वासने देण्याची कामे केली. पण विकासकामे झालेले कोठेच दिसून आली नाहीत, असा आरोप कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर केला.
राज्यात नुकतेच महाविकासआघाडीचे सरकार स्थापित करण्यात आले आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यासोबतच महाविकासआघाडीच्या सहा नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितीन राऊत यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
राऊत म्हणाले, राज्यावर तब्बल 6.71 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. फडणवीस सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले. याबाबत खासदार अनंतकुमार हेगडे यांचेच वक्तव्य बोलके आहे. 40 हजार कोटी केंद्राला परत गेले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.