कोलकता – पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे भाजपने आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे. दरम्यान, जीजेएम यापुढे बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला साथ देणार आहे.
जीजेएमचे प्रमुख बिमल गुरूंग यांनी येथील एका हॉटेलमध्ये अचानकपणे आणि अनपेक्षितपण पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी जीजेएमची पुढील रणनीती जाहीर करताना भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आम्ही 2009 पासून एनडीएचा घटक होतो. तसे असूनही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दार्जिलिंग क्षेत्रासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याच्या आश्वासनाचे पालन केले नाही.
गोरखा समुदायाला अनुसूचित जमातींच्या यादीत अद्याप स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यात फसवणूक झाल्याची भावना आहे, असे त्यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात जीजेएमने घेतलेला निर्णय तृणमूलसाठी राजकीय फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.
स्वतंत्र गोरखालॅंड राज्याची मागणी जीजेएमने सातत्याने लावून धरली आहे. त्या मागणीसाठी 2017 यावर्षीच्या अखेरीस जीजेएमने तीव्र आंदोलन केले. त्या आंदोलनावेळी हिंसक घटना घडल्या. त्यामुळे गुरूंग यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. त्या आंदोलनानंतर तपास आणि सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी गुरूंग फरार होते.
अचानक कोलकत्यात झाले दाखल
सुमारे तीन वर्षांपासून फरार असणारे गुरूंग अचानकपणे कोलकत्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जीजेएमची पुढील रणनीती स्पष्ट केली. दार्जिलिंगमधून बाहेर पडल्यानंतर दीर्घ काळ दिल्लीत वास्तव्य केले. त्यानंतर दोन महिन्यांपासून झारखंडमध्ये राहत होतो, असे त्यांनी नमूद केले.