घोरपडी – कॉंग्रेसच्या काळात तूरडाळ, गॅस, रॉकेल वगैरे जीवनावश्यक वस्तू गरिबांच्या आवाक्यात होत्या. त्यासाठी कॉंग्रेसने अन्न सुरक्षा कायदा केला होता, मात्र भाजप सरकारने तूरडाळीचे भाव आवाक्याबाहेर नेले. सिलिंडर साडेआठशेवर नेला, रॉकेल तर बाजारातून गायबच झाले. भाजपने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाघाडीचे कॅन्टोन्मेंटमधील उमेदवार रमेश बागवे यांनी केली.
त्यांच्या प्रचारार्थ घोरपडी बाजार येथे कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बागवे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्टोन्मेंटमधील नागरिक एफएसआय वाढवून मिळवण्याची मागणी करत आहेत, पण भाजप त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कॅन्टोन्मेंट कामगारांना पगार देण्याच्या स्थितीत बोर्ड नाही. कारण, केंद्राकडून बोर्डाला मिळणारा हजारो कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे सांगून त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डावर टीका केली. यावेळी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
पदयात्रेस मोठा प्रतिसाद
बागवे यांनी कॅन्टोन्मेंट प्रभाग क्र. 21 व 7 मधील अनंत टॉकिज येथे पदयात्रेस सुरुवात झाली. श्रावस्तीनगर, बालाजीनगर, श्रीनाथनगर, निगडेनगर, कवडे मळा, अशा मार्गे जाऊन बी.टी. कवडे रोड येथे त्याचा समारोप करण्यात आला. यावेळी पालिका शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष संगीता तिवारी, स्थानिक पदाधिकारी सुरेखा कवडे, पुणे सिटी प्रियदर्शिनी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पूनम बोराटे, शांताराम कवडे, संजय कवडे, चंद्रकांत कवडे, प्रदीप परदेशी, संकेत कवडे, नंदू निंबाळकर, प्रशांत म्हस्के, क्लेमेंट लझरस, शामराव वाघमारे, टोनी अँथोनी, अमलराज फ्रान्सिस, अलविन आनंदराज यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.