नवी दिल्ली – मणिपूरमध्ये कॉग्रेसच्या सहा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला आहे. हे सर्व आमदार काँग्रेसच्या आठ आमदारांपैकी आहेत ज्यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करत सोमवारी विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात गैरहजेरी लावली होती. या सत्रात भाजपाप्रणित एन. बीरेनसिंग सरकारने विश्वासादर्शक ठराव जिंकला होता.
राजीनामा दिलेल्या आमदारामध्ये वांगखाई विधानसभा मतदारसंघातील आमदार हेनरी सिंग यांच्या व्यतिरिक्त ओइनम लुखोई (वांगोई), मोहम्मद अब्दुल नासिर (लिलोंग), पोनम ब्रोजन (वांगजिंग तेंठा), नागमाथांग होकीप (सैतू) आणि गिनसुआनहु (सिंघट) यांचा समावेश आहे. या आमदारांनी ओ इबोबी सिंग यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, मागच्यावेळी राज्यात सर्वात मोठा पक्ष असतानाही कॉंग्रेस राज्यात सरकार बनविण्यात अपयशी ठरली होती.
हेनरी सिंग म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष युमनम खेमचंद सिंग यांनी विधानसभा सत्रानंतर सोमवारी रात्री त्यांना बोलावले होते आणि त्यांच्या राजीनामा पत्राची चौकशी केली होती. त्यांनी सांगितले की, अध्यक्षांनी अद्यापर्यत त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही. हेनरी सिंग म्हणाले की, ते पक्षाच्या सदस्यत्वाचा सांयकाळी राजीनामा देणार आहेत.
भलेही विश्वासदर्शक ठरावापूर्वीच सरकारचा विजय निश्चित झाला असला तरी, महत्त्वपूर्ण अधिवेशनाच्या सत्रात कॉंग्रेसच्या आठ आमदारांच्या अनुपस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा राजकीय डाव दिसून आला आहे. 60 सदस्यांच्या विधानसभेत अध्यक्षांसह विद्यमान आमदारांची संख्या 53 आहे. जर समान मते असतील तर अध्यक्ष आपले मत वापरू शकले असते.
यापूर्वी विधानसभेच्या चार सदस्याना अपात्र ठरविण्यात आले होते आणि काही काळापूर्वी भाजपच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. सत्ताधारी एनडीए युतीकडे अध्यक्षांसह 29 आमदार होते, तर कॉंग्रेसचे 24 आमदार होते. त्यापैकी आठ कॉंग्रेस आमदार अधिवेशनातील सत्रात गैरहजर राहिले.