मुंबई – राज्य सरकार सर्व प्रकारे नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा असे साकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला घातले आहे. यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्य सरकार काही झालं तरी केंद्र सरकार आठवतं असा टोला लगावला आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर
“राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज राज्यावर ही सद्य परिस्थिती आली आहे. मला राज्य सरकारला विचारायचे आहे की, आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काय केलं याचा आकडा सर्वांसमोर आला पाहिजे. केंद्राने राज्य सरकारला दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचं घोषित केलं असताना तो आणण्याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी साधे ३२ टँकर उपलब्ध करु शकत नाही. वाहतुकीसाठी विशेष विमानांची व्यवस्था का केली जात नाही?” असा प्रश्न ही त्यांनी विचारला आहे. तसेच जास्त बोलण्यापेक्षा कृती करा असा सल्ला ही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.