नवी दिल्ली – मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींवर योग्य संस्कार केले तर बलात्काराचे प्रकार होणार नाहीत, असे बेताल वक्तव्य भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले होते. या वक्तव्याचा सर्वच स्तरावरून निषेध नोंदवण्यात आला. सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही समाचार घेत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या कि, हाथरस प्रकरणानंतर काही जण मुलींना उपदेश देत आहेत. ते म्हणातात की, मुलींना संस्काराची गरज आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की कुटुंबासाठी मुलगा आणि मुलगी हे एक असून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे.
हाथरस प्रकरणाने मी खूप अस्वस्थ झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठित केली. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपवले. लवकरच त्याचे सत्य समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील भाजपाचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनीही आज हाथरस प्रकरणात मुलीचीच चुक असल्याचे सांगत मुक्तफळं उधळली. मुलीनं मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण प्रेमप्रसंग होता. मुलीला पकडलं गेलं असेल. शेतामध्ये असंच होतं. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदुळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे.
त्यांना कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचं बोललो नाही. पण मुलगी दोषी नाही, मुलं दोषी आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी केले आहे.