नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अनेक आरोप केले होते.त्या आरोपांना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पाटणा येथे पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर जोरदार टीका केली. रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींना 2019 मधील त्यांच्या एका भाषणामुळे शिक्षा झाली आहे. आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी विचार करून बोलतो, त्यामुळे 2019 मध्ये राहुल गांधी जे बोलले ते विचार करूनच बोलले असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला.
माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, राहुल गांधी यांनी एका समाजाचा अपमान केला होता. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला अपमान करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी शिवीगाळ केली होती. विचार करून बोलले, तर राहुल गांधींनी एका समाजाचा जाणीवपूर्वक अपमान केला, असे भाजपचे मत आहे आणि भाजप त्याचा निषेध करते. त्यांच्याविरोधात आम्ही देशभरात मोठे आंदोलन उभारणार असल्याचे देखील यावेळी रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, आज राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले की मी लंडनमध्ये काहीही बोललो नाही. भारतात लोकशाही कमकुवत होत असून युरोपीय देश लक्ष देत नसल्याचे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये म्हटले होते. खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभाव बनला आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण जीवन हे प्रामाणिकपणाचे खुले पुस्तक आहे, त्यात एकही डाग नाही, ते 9 वर्षे भारताचे पंतप्रधान आहेत आणि देश पुढे जात आहे. राहुल गांधींना भ्रष्टाचारावर बोलायला लाज वाटत नाही. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ते जामिनावर आहेत अशी टीका देखील रविशंकर प्रसाद यांनी आईवेळी केली.