मुंबई – भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर साधू हत्याकांडप्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. मात्र त्याआधीच राम कदम यांना त्यांच्या १०० कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Maharashtra: BJP MLA Ram Kadam and his supporters detained by Police from outside his residence in Mumbai. They were taking out a ‘Jan aakrosh yatra’ to Palghar demanding CBI probe into Palghar mob lynching case. pic.twitter.com/rYUxFKOV71
— ANI (@ANI) November 18, 2020
राम कदम आज सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार होते. पालघर हत्याकांड प्रकरणाला २११ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात समर्थक जमा झाले व ‘भारत माता की जय’ ची घोषणाबाजी करण्यात येत होती. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
राम कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकावर टीका केली. याप्रकरणी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून तो दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.