नवी दिल्ली – आपल्या तोंडावर ताबा नसल्याने सतत नवा वाद छेडण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी कंगनाने थेट भारताला १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ म्हणत स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा घोर अपमान केला आहे.
कंगनाच्या या अत्यंत खालच्या पातळीच्या वक्तव्यावर आता देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्यांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण गांधी यांचा देखील समावेश आहे.
वरुण गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कंगना रानौतच्या या बेताल वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कंगनाच्या स्वातंत्र्याबाबतीतील वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत वरुण गांधी यांनी, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?” असे ट्विट केले आहे.
काय म्हणाली कंगना?
भारतीय स्वातंत्र्याबाबत अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करताना अभिनेत्री कंगना रनौतने, “भारताला खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं १९४७ मध्ये मिळालं ती तर भीक होती.” असं म्हंटलं होत. ती एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होती.
कंगना भाजपची कडवी समर्थक!
अभिनेत्री कंगना रानौत ही भारतीय जनता पक्षाची कडवी समर्थक मनाली जाते. भाजपच्या समर्थनार्थ ती अनेकदा जाहीर वक्तव्य तसेच समाज माध्यमांवर व्यक्त होत असते. मात्र अनेकदा जिभेवर ताबा न ठेवल्याने तिला वादाला तोंड द्यावे लागते. शेतकरी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक खलिस्तानी असल्याचा आरोप कंगनाने लगावला होता. त्यावेळी पंजाबी गायक दिलजीत डोसांज याने चांगलाच पाणउतारा केला होता.
कंगनाच्या शेतकरी आंदोलनाबाबतीतील टोकाच्या वक्तव्यांमुळे तिचे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहे.