थिरुअनंतपूरम – देशभरामध्ये सध्या केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये या कायद्यांचे स्वागत होताना दिसतंय तर बिगर भाजपशासित राज्य या कायद्यांविरोधात ठराव आणत आहेत. अशातच आज केरळ विधानसभेमध्ये देखील केंद्राने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. मात्र केरळ विधानसभेत मांडलेल्या या ठरावास अनपेक्षित पाठिंबा मिळाल्याने सर्वत्र याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
केरळ विधानसभेतील भाजपचे एकमेव आमदार असलेले ओलान्चेरी राजगोपाल यांनी कृषी कायद्यांविरोधात मांडलेल्या या ठरावास पाठिंबा दिलाय. विधानसभा अध्यक्ष पी श्रीरामकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात मांडण्यात आलेला ठराव आवाजी मतदानाद्वारे एकमताने मंजूर झाला.
मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद भूषविलेल्या भाजप नेते राजगोपाल यांनी हा ठराव मांडण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सभात्याग केला नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी ठरावात मांडलेल्या मुद्द्यांना सहमतीही दर्शवली.
BJP’s lone member in Kerala Assembly, O Rajagopal, supports resolution seeking scrapping of three contentious farm laws against which farmers have been agitating for over a month at Delhi borders
— Press Trust of India (@PTI_News) December 31, 2020
दरम्यान, नव्या कृषी कायद्यांची जोरदार पाठराखण करत असलेल्या भाजपची एका ज्येष्ठ नेत्यानेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने चांगलीच नाचक्की झाली आहे. याबाबत केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी, ‘राजगोपाल यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षविरोधी भूमिका घेतील असं वाटत नाही, ते विधानसभेत नेमकं काय म्हणाले हे पाहून त्यांच्याशी चर्चा करू’ असं म्हंटलंय. असं असलं तरी राजगोपाल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्यात.