मुंबई – मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिलाय. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची पूर्वतयारी नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली, ही सरकारची नाचक्कीच आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
न्यालयापुढे आज मुकुल रोहतगी यांनी कोणतेही नवीन मुद्दे न मांडता पुन्हा-पुन्हा तेच तेच मुद्दे मांडले आहेत. जेव्हा पुनर्विचार याचिका दाखल केली जाते तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. मागील वेळी जे मुद्दे मांडले तेच आज मांडले गेले त्यामुळेच यावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नाकर दिलाय. आता जानेवारीमध्ये सुनावणी होणार असल्याने मराठा समाजापुढे मोठा अंधार निर्माण झालाय, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील नोकरभरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगितीपूर्वीची नोकरभरती करण्याची परवानगी देखील नाकारली. यामुळे राज्यातील नोकरभरतीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडणार असून हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी बाजू मांडली. मात्र न्यायालयाने या प्रकरणात विस्तृत सुनावणी केली जाईल असं स्पष्ट केलं. याप्रकरणी २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.